नेते होऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्याचा ‘आवाज’

Are Avaaj Konacha Poster
Rating: ★★★
निर्मिती: कॉमनमॅन फिल्मस
निर्माते: चिद्विलास क्षीरसागर , हर्शल गरुड , स्वप्नील नाईक
दिग्दर्शक: हेमंत देवधर
पटकथा, संवाद: प्रताप गंगावणे
छायाचित्रण: संजय जाधव
संगीत: शैलेन्द्र बर्वे
कलाकार: डॉ. अमोल कोल्हे, उदय टिकेकर, तुषार दळवी, मनोज जोशी, ऐश्वर्या नारकर, विशाखा सुभेदार , प्रतीक्षा जाधव, अथर्व कर्वे आणि इतर
Movie Review by: श्रीकांत ना. कुलकर्णी

एकेकाळी सेवाभावी कार्यकर्त्यांची आपल्या देशात कधीच वानवा नव्हती. स्वातंत्र्यापूर्वी तर तन-मन-धन देवून प्रसंगी आपल्या घरादाराचीही कसलीही पर्वा न करता समाजाच्या भल्यासाठी कार्य करणारे कार्यकर्ते होते. स्वातंत्र्यानंतरही काही वर्षे तशीच परिस्थिती होती. परंतु अलीकडच्या काळात सगळे वातावरणच बदलले. अनेक चळवळी थंडावल्या आणि कार्यकर्ता नामक जात हळूहळू नष्ट होत चालली. सामाजिक कार्यात तर आता फारच थोडे कार्यकर्ते शिल्लक राहिले असलेले दिसतात. राजकीय पक्षात कार्यकर्ते आहेत मात्र त्यांच्यातील एकनिष्ठता आणि धीर धरण्याची वृत्ती लोप पावत चालली आहे. थोडेसे जरी कार्य केले तरी त्याचा मोबदला लगेच मिळावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते. निवडणुकीत प्रामाणिक आणि सेवाभावी कार्यकर्त्याला तिकीट मिळणे हे सर्वच पक्षात अडचणीचे होऊन बसले आहे. उलट साम-दाम-दंड-भेद असणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट मिळणे सोपे झाले आहे कारण तो निवडणूक लढवू शकतो आणि जिंकू शकतो म्हणून. त्यामुळे साहजिकच प्रामाणिक आणि सेवाभावी कार्यकर्त्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. ‘अरे आव्वाज कोणाचा’ या नव्या मराठी चित्रपटात अशाच प्रामाणिक कार्यकर्त्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा आणि मांडणी त्यादृष्टीने प्रभावशाली ठरली आहे. मात्र वास्तवाचा विचार करता मनात कोठेतरी अनुत्तरीत सल राहतेच.

Awaaz Kunacha

उदय सावंत (अमोल कोल्हे) हा विद्यार्थी दशेपासून अन्याय आणि दादागिरीविरुद्ध आवाज उठविणारा एक कार्यकर्ता म्हणून नावारूपास येतो. त्याची काम करण्याची धडाडी पाहून त्याला आपल्या पक्षात (गटात) ओढण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा लागते. प्रारंभापासून उदय आण्णासाहेबाच्या (उदय टिकेकर) गटात असतो. मात्र अण्णासाहेब त्याचा फार हुशारीने वापर करून घेतात. उदयचे वाढत चाललेले वर्चस्व हे अनेक नेत्यांच्या डोळ्यात खुपते. त्यामुळे त्याला एका जमीन-खरेदी प्रकरणात अडकवले जाते. त्यातून उदयचे नष्टचर्य सुरु होते. मात्र तो या प्रकरणातून तावून-सुलाखून बाहेर पडतो. आणि त्याची अखेर निर्दोष मुक्तता होते.

पुण्यात मध्यंतरी घडलेल्या एका ‘लैंड-माफिया’ प्रकरणाशी या चित्रपटाची कथा तंतोतंत जुळणारी आहे. हे सुजाण प्रेक्षकाला कळल्याशिवाय राहत नाही त्यामुळेच त्यातील वास्तव लक्षात घेता संबधित नेत्याचे उदात्तीकरण करण्याचा हा प्रयत्न नाही ना अशी उगाचच शंका येऊ लागते. चित्रपटाची कथाही त्याच अभिनिवेशाने पुढे सरकत जाते. उदय सावंत विरुद्ध अनेक आरोप असूनही त्याला एकदाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिलेले दाखविले नाही. शेवटी तो आरोपीच्या पिंजऱ्यात आहे

तोही स्वत:च्या बचावासाठी नाही तर कार्यकर्त्यांचा ‘आवाज’ बुलंद करण्यासाठी त्यामुळे ती बाब खटकते. परंतु एकूणच विषयाची व्याप्ती आणि त्याचे सादरीकरण पाहता चित्रपटातले ‘राजकारण’ चांगली करमणूक करून जाते. अमोल कोल्हे, उदय टिकेकर, नंदन बाळ, तुषार दळवी, मनोज जोशी, विशाखा सुभेदार, प्रतीक्षा जाधव यांच्यासह नवकलाकारांचीही कामेही चांगली झाली आहेत. संजय जाधव यांचे छायाचित्रण अप्रतिम असून गणपती मिरवणुकीसारखी समूह्दृश्ये खूपच प्रभावशाली ठरली आहेत. थोडक्यात नेते होऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्याचा हा ‘आवाज’ एकदा पाहायला हरकत नाही.