माधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”

“फादर्स डे” निमित्ताने बिग बॉस मराठीच्या घरात असलेल्या अभिनेता माधव देवचकेचे वडील चारूदत्त देवचके ह्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, “लहानपणापासूनच माधवमध्ये समंजसपणा आम्हांला दिसून आलाय. ब-याचदा मुलांची ओळख त्यांच्या वडिलांमूळे असते. पण माझी ओळख माधवच्या लहानपणापासूनच ‘माधवचे वडिल’ अशी होती. मी नाट्यनिर्माता असल्यामूळे माझ्या ओळखीचा फायदा माधवला करीयरमध्ये कधी ना कधी व्हावा, अशी माझी इच्छा होती. पण माधवने कुठेही माझी ओळख न वापरता स्वत:च्या ताकदीवर आपलं करीयर घडवलं, याचा मला अभिमान आहे. अभिनेत्याच्या करीयरमध्ये ब-याचदा आर्थिक उतार-चढाव होत असतात, पण अशावेळेसही मी देऊ केलेली मदत स्वावलंबी माधवने स्विकारली नाही.”
बिग बॉसमध्ये माधव खूप चांगलं खेळतोय. असे मत व्यक्त करून त्यांनी माधवला शुभेच्छा दिल्यात.
‘जजमेंट’ महिला सशक्तीकरणासाठी अर्थपूर्ण चित्रपट – रामदास आठवले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणारा ‘फत्तेशिकस्त’ प्रेक्षकांच्या भेटीस

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘फर्जंद‘ चित्रपटाच्या यशानंतर आता इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडू पाहत आहेत. ‘फर्जंद‘ नंतर आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणारा ‘फत्तेशिकस्त’ लवकरच इतिहासप्रेमींच्या भेटीस येणार असून पन्हाळगडावर कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला आहे.
आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत ‘फत्तेशिकस्त‘ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे.
मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारख्या मातब्बर कलाकारांची भट्टी ‘फत्तेशिकस्त‘च्या निमित्ताने पुन्हा एकदा जुळून आली आहे. शिवाय हिंदी चित्रपट-मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी सुद्धा या चित्रपटाद्वारे मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

इतिहास हा असा दुवा आहे जो आपल्याला तत्कालीन घटनांशी जोडून ठेवतो, आणि हा दैदिप्यमान इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजरामर पराक्रमाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अशाच एका शिवकालीन रोमांचकारी सर्जिकल स्ट्राईकची आठवण करून देणारा ‘फत्तेशिकस्त‘ आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज होतोय.
‘स्माईल प्लीज’ चित्रपटात अभिनेत्री अदिती गोवित्रीकर डॉक्टर भूमिकेत
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री मध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी सुंदर अभिनेत्री म्हणजे अदिती गोवित्रीकर. २००९ मध्ये अदितीने संजय जाधव यांच्या ‘रिंगा रिंगा‘ या चित्रपटामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि आता लवकरच ती विक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज‘ या दुसऱ्या मराठी चित्रपटात झळकणार आहे.

विक्रम फडणीस आणि अदिती गोवित्रीकर यांची मैत्री खूपच जुनी आहे. आपल्या या मैत्रीबद्दल आणि ही भूमिका कशी मिळाली याबद्दल अदिती सांगते, ”सुरुवातीच्या काळात विक्रम नृत्य दिग्दर्शक होता आणि त्याचे शोज मी आवर्जून पाहायचे. तेव्हापासून आमची मैत्री आहे. ज्यावेळी त्याने ‘हृदयांतर‘ हा चित्रपट केला त्यावेळी मला मनापासून वाटायचे, की भविष्यात त्याच्या चित्रपटाचा भाग व्हावा आणि माझी ही इच्छा लवकरच पूर्ण झाली. त्याने मला त्याच्या ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटासाठी विचारणा केली. चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी अदिती म्हणते, ”या चित्रपटाचे कथानकच मुख्य हिरो आहे. कथानक अतिशय सशक्त असल्याने हा चित्रपट नक्कीच उत्कृष्ट ठरेल. वैयक्तिक आयुष्यात मी डॉक्टर असल्याने पडद्यावरही डॉक्टरची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाल्याने मी खूपच खुश आहे.’
‘स्माईल प्लीज‘ हा चित्रपट येत्या १९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.
कसा असेल शिवा – सिद्धीचा लग्नानंतरचा प्रवास?
लग्नानंतर मुलीचे संपूर्ण आयुष्यचं बदलून जाते. सिद्धी आणि शिवाचं नातं अगदी विरोधात आहे .. ज्यामध्ये लग्न होण्याआधीपासून फक्त तिरस्कार, द्वेष आहे… आत्याबाईंनी या दोघांचं लग्न त्यांच्या स्वार्थापोटी लावून दिलं खरं पण या दोघांचं भविष्य काय आहे ? हा तिरस्कार त्यांच्या नात्याला कुठे घेऊन जाईल ? आता शिवाच्या घरचे त्यांना ज्योतिबाच्या दर्शनाला घेऊन जाणार आहेत. हा विधी एका नव्या नात्याची सुरुवात करून देणारा क्षण ठरणार आहे हे नक्की !

शिवा आणि सिद्धीच्या लग्नात बरेच विघ्न आले आणि दोघांच्या मनाविरुध्द हे लग्न झाले… दोघांनाही या लग्न बंधनामधून सुटका हवी आहे… हे दोघेही ज्योतिबाच्या दर्शनास जायला तयार झाले आहेत पण, ह्या प्रथेनुसार नवऱ्याने बायकोला उचलून पायऱ्या चढायच्या असतात… आता दोघांनाही हा विधी करण कठीण जाणार आहे… ‘जीव झाला येडापिसा‘ मालिकेमध्ये पुढे काय होईल ? कसा असेल शिवा – सिद्धीचा लग्नानंतरचा प्रवास ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा ‘जीव झाला येडापिसा‘ मालिकेचा विशेष भाग या आठवड्यामध्ये रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.शिवा – सिद्धी ज्योतीबाला काय घालणार साकडं ?
अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या वाढदिवसानिमित्त ‘पुष्कर शो THREE’
लोकप्रिय अभिनेते पुष्कर श्रोत्री यांचा येत्या ३० एप्रिल रोजी ५० व्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्या निमित्ताने, ‘पुष्कर शो THREE‘ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये पुष्कर श्रोत्री यांच्या सध्या सुरु असलेल्या ‘आम्ही आणि आमचे बाप‘, ‘अ परफेक्ट मर्डर‘, ‘हसवा फसवी‘ या तीन नाटकांचा महोत्सव दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे रविवार दि. ५ मे रोजी होणार आहे. महोत्सवातील तीनही प्रयोगाचे उत्पन्न सामाजिक संस्थांना दिले जाणार आहे.

आदी कल्चरटेन्मेंट निर्मित ‘आम्ही आणि आमचे बाप‘ या पु. ल. देशपांडे आणि आचार्य अत्रे यांच्या साहित्य संपदेला अभिवादन करत पुनरुज्जीवित करणारी ही एक नाट्यकृती असून सकाळी ११ वा. सादर होणाऱ्या या पहिल्या प्रयोगाचे उत्पन्न ठाण्यातील ‘सिग्नल शाळा’ या संस्थेला देण्यात येईल. ट्रॅफिक सिग्नलवर भिक मागणाऱ्या व फुल, वस्तू विकणाऱ्या लहान मुलांना साक्षर बनविण्याच कार्य ही संस्था करते. तसेच बदाम राजा निर्मित ‘अ परफेक्ट मर्डर‘ या दुपारी ४ वा. सादर होत असलेल्या दुसऱ्या प्रयोगाचे उत्पन्न कोल्हापुरातल्या ‘चेतना’ संस्थेला दिले जाईल. गतिमंद आणि विकलांग मुलांना विविध कला शिकवून त्यांना स्वयंपूर्ण करण्यात या संथेचे मोठे योगदान आहे. तर रात्री ८.३० वा. जिगिषा-अष्टविनायक निर्मित दिलीप प्रभावळकर लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘हसवा-फसवी‘ चा प्रयोग होणार आहे. या प्रयोगाचे उत्पन्न अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या संकल्पनेतून कर्जेत येथे उभ्या राहणाऱ्या ‘कलाश्रय’ या वृद्धाश्रमाच्या स्थापनेसाठी दिले जाणार आहे.
सावरलेल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट ‘पेठ’
प्रेम करणं ही एक सहजवृत्ती आहे. नात्यातले अनुबंध जपत प्रेमाची अनोखी ‘पेठ‘ उलगडणारा प्रेमपट लवकरच मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. पोस्टर अनावरणाने या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. शारदा फिल्म प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘पेठ‘ चित्रपटाचे निर्माते वीरकुमार शहा तर दिग्दर्शक अभिजित साठे आहेत. प्रेम निभावणं मात्र आज जिकरीची गोष्ट आहे. अशाच विखुरलेल्या विश्वातील सावरलेल्या प्रेमाची गोष्ट ‘पेठ‘ या चित्रपटात पहायला मिळणार असून वेगळ्या धाटणीची ही प्रेमकथा प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास दिग्दर्शक अभिजित साठे यांनी व्यक्त केला.

वृषभ शहा आणि नम्रता रणपिसे ही नवी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर येणार आहे. यासोबत अभिषेक शिंदे, राज खंदारे, संकेत कदम या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका असणार आहेत.या चित्रपटाचे लेखन पटकथा-संवाद तसेच कलादिग्दर्शन अभिजित साठे यांचे आहेत. पी.शंकर यांनी गीत-संगीताची तर नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी गजानान शिंदे यांनी सांभाळली आहे. कार्यकारी निर्माते अविनाश जाधव आहेत.

गायिका सावनी रविंद्रचा ‘लताशा’ कॉन्सर्ट आता हिंदीत
गायिका सावनी रवींद्र पाच वर्षांपासून लताशा मैफल करत आहे. लताशा म्हणजे गानसरस्वती लता मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले ह्यांच्या सदाबहार गाण्यांची मैफल. हा कार्यक्रम सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्र गेली पाच वर्ष करत आहे. अमिट गोडीची मराठी गीते ह्यातून कानसेनांना ऐकायला मिळत असतात. आता पाच यशस्वी वर्षांनंतर लोकाग्रहास्तव सावनी ही क़न्सर्ट हिंदीमधून घेऊन आलीय.

गायिका सावनी रविंद्र म्हणते, “गेली पाच वर्ष लताशा मराठीत करताना, अनेकजण मला लतादीदी आणि आशाताईंच्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम करावा, अशी मागणी करत होती. मग मी बाबा(पंडित हृदयनाथ मंगेशकर ) ह्यांच्या परवानगीने आणि त्यांच्या आशिर्वादाने हिंदी कार्यक्रम सुरू करायचे ठरवले. आणि पहिले दोन कार्यक्रम पूण्यात केले. तिथल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतर मुंबईतल्या रसिकांसमोर कार्यक्रम सादर करायचा आत्मविश्वास आला. आणि मग आता 26 एप्रिलला दिनानाथ मंगेशकर सभागृहात हा कार्यक्रम आम्ही करत आहोत.”

अभिनेत्री स्पृहा जोशी सहभागी होणार श्रमदानात
अभिनेत्री स्पृहा जोशी आपल्याला श्रमदान करताना दिसणार आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या झांसीमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र हे चित्रीकरण ह्या आठवड्याअखेरीस आटोपून ती लवकरच परतणार आहे. आणि पाणी फाउंडेशनच्या श्रमदानात आमिर खान आणि इतर मराठी कलाकारांसह सहभागी होणार आहे.
अभिनेत्री स्पृहा जोशी 1 मे रोजी श्रमदानासाठी जाणार आहे. ती गेल्यावर्षीच्या अनुभवाविषयी सांगते, “मुंबई-पुण्यातल्या सुखासीन आयुष्याच्या बाहेर भयावह परिस्थितीत पाण्यासाठी वणवण करणा-या लोकांची आयुष्य पाणी फाउंडेशनच्या मोहिमेमूळे मला पाहायला मिळाली. पाणी फाउंडेशनसोबत, दुष्काळाशी दोन हात करताना, इंडिया भारतात परतल्याचा सुखद अनुभव मिळतो.”

स्पृहा पूढे सांगते, “पाणी फाऊंडेशनची मोहिम आता चळवळ झालीय. पाणी फाउंडेशनसाठी काम करताना नैसर्गिक आपत्तीवर आपण मात करण्याचा आनंद गावकर-यांच्या आणि शेतक-यांच्या चेह-यावर मला दिसून आलाय.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित कलर्स मराठीवर ‘जलसा महाराष्ट्राचा’
भारतात दरवर्षी १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याच दिनाचे औचित्य साधून कलर्स मराठीवरून ‘जलसा महाराष्ट्राचा‘ हा कार्यक्रम येत्या रविवारी १४ एप्रिलला दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता कलर्स मराठीवरून प्रसारित होणार आहे. वैचारिक जागर जलसा महाराष्ट्राचा या कार्यक्रमातून बघायला मिळणार आहे. या जलश्यामध्ये आनंद शिंदे, लोकशाहीर संभाजी भगत, विदर्भातील नामवंत गायक अनिरुद्ध वनकर, प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने माडे, गायक प्रसेनजीत कोसंबी, कडूबाई खरात, कव्वालीचा सामना रंगवणाऱ्या सुषमा देवी, आपल्या गीतांच्या माध्यमातून महापुरुषांच्या वैचारिक क्रांतीची गोष्ट सांगणारे सचिन माळी, शीतल साठे, भीमस्पंदन बँड, धम्मरक्षक बँड, शिंदेशाहीचा आजच्या पिढीचा वारसा जपणारे डॉ. उत्कर्ष शिंदे आदी कलाकारांच्या गायनाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

याशिवाय प्रायोगिक नाट्य चळवळीत अग्रगण्य असणाऱ्या आविष्कारच्या ‘संगीत बया दार उघड‘ चे काही प्रवेशही सादर होणार आहेत. डॉ. सुषमा देशपांडे यांचं ‘व्हय मी सावित्री‘ आता एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शुभांगी भुजबळ आणि शिल्पा साने या दोघींनी सादर केलेली या नव्या रूपाची झलकसुद्धा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ‘जलसा महाराष्ट्राचा‘ या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे संवेदनशील कवी आणि सामाजिक भान जपणाऱ्या अभिनेता जितेंद्र जोशी याने.

